कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (उत्तरार्ध)
डॉ. संजीवनी केळकर यांचं मनोगत ग्रामीण महिलांनी चालवलेली महिलांसाठी काम करणारी महिलांची सेवाभावी नोंदणीकृत ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात १९७८पासून कार्यरत आहे. केवळ सहसंवेदनेच्या पायावर उभ्या राहिलेल्या आणि महिलांनी जिद्दीने यशस्वी केलेल्या या परिवर्तन चळवळीचा प्रवास शब्दांकित करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘देवराई’. १९७८ ते २०२५ या कालखंडात या संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रवासाचं सिंहावलोकन करण्यासाठी मी मागे वळून पाहते तेव्हा माझं मलाच नवल वाटतं. कारण या प्रवासाची वाट रुळलेली नव्हती. या वाटेवर धोक्याची वळणं होती. कधी पायाखाली रुतणारे काटे होते. कधी हिरवळही होती. कधी पावसाचा प्रसन्न शिडकावा. तर कधी मुसळधार पाऊस. कधी तप्त सूर्याचे प्रखर किरण. तर कधी क्वचित मिळणारी थंडगार सावली. याशिवाय या प्रवासाचा पल्लाही खूप लांबचा होता. हे सगळं ‘साहून’ मी कशी काय तग धरून राहिले? काय होतं माझ्याजवळ? माझं माहेर संपन्न. सुसंस्कृत आणि माणुसकी जपणारं होतं. आजही आहेच. आजही संस्थेच्या कुठल्याही कामाला गोडबोले मंडळींचं नेहमीच सहकार्य असतं....